भगवान शंकर आणि माता गौरी यांना समर्पित असलेला गणगौर उत्सव सुरू झाला आहे. विवाहित महिला त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुख आणि समृद्धीसाठी हे गणगौर व्रत करतात. प्रामुख्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये गणगौर उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यासाठी जयपूरमधील राजघराण्यातर्फे हत्तीवरून माता गौरीची मिरवणूक काढली जाते. सोन्याच्या अंबारीतून निघणारी माता गौरीची ही शाही मिरवणूक जयपूरच्या पर्यटनासाठीही तेवढीच महत्त्वाची ठरली आहे. शाही मिरवणूक पाहण्यासाठी भारतभरातून पर्यटक जयपूरमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. मार्च महिन्यात साजरा होणाऱ्या या उत्सवासाठी आतापासूनच परदेशी पर्यटक जयपूरमध्ये येत आहेत. १६ दिवसांचे गणगौर व्रत चैत्र शुक्ल तृतीयेला, म्हणजेच २१ मार्च २०२६ रोजी माता गौरीच्या मिरवणुकीने संपणार आहे. १६ अलंकारांनी सजवलेल्या गौरीमातेच्या मातीच्या मूर्तीची मिरवणूक ज्या मार्गातून निघणार आहे, त्या मार्गाचे आतापासून सुशोभीकरण सुरू झाले आहे.

जयपूरमध्ये गणगौर उत्सव सुरू झाला आहे. १६ दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा २१ मार्च रोजी, चैत्र शुक्ल तृतीयेला, विधी, विसर्जन आणि मिरवणुकीने समारोप होणार आहे. संपूर्ण गणगौर उत्सव “१६” या संख्येशी जोडला गेला आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी १६ दिवस कठोर तपस्या केली. त्यांच्या अढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी माता पार्वतीसोबत विवाह केला. तेव्हापासून १६ दिवसांचे हे गणगौर व्रत सुरू झाल्याची धारणा आहे. या व्रतामध्ये सर्व पूजा साहित्य १६ संख्येमध्ये माता गौराईला अर्पण केले जाते. यामध्ये काजळ, सिंदूर, मेहंदी आणि बिंदी यांचाही समावेश असतो. हे महिलांच्या सौभाग्याचे दागिने मानले जातात. पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकराची मातीची मूर्ती तयार केली होती. तशीच मूर्ती हे व्रत करणाऱ्या महिला तयार करतात. राजस्थानमध्ये इसरला भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते आणि गणगौर मातेला देवी पार्वतीचे प्रतीक मानले जाते.
या सर्वात जयपूर राजघराण्यातील गणगौर मातेच्या मिरवणुकीकडे सर्वांचेच लक्ष असते. जयपूरची शाही मिरवणूक, उदयपूरमधील पिचोला तलावाकाठी सजवलेल्या बोटींचा चित्तथरारक देखावा आणि बिकानेरचा पारंपरिक रॉयल गणगौर उत्सव यामुळे या उत्सवात अलिकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक सहभागी होऊ लागले आहेत. या संपूर्ण काळात लोकगीते, पारंपरिक पेहराव आणि आकर्षक सजावट यामुळे परिसर गजबजून जातो. असे मानले जाते की, गणगौर उपवास आणि पूजा केल्याने अविवाहित मुलींना इच्छित जीवनसाथी मिळतो, तसेच कुटुंबांना आनंद, समृद्धी आणि शांती लाभते. या व्रतामुळे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे आशीर्वाद मिळतात, अशी भावना आहे. त्यामुळे राजस्थानचे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर या उत्सवासाठी सजले आहे.
=======
हे देखील वाचा : Chaitra Navratra : महाराष्ट्रातील पहिले आणि पूर्ण शक्तीपीठ – तुळजापूरची तुळजाभवानी
=======
गणगौरसाठी लागणाऱ्या साहित्यांनी येथील बाजारपेठा सजल्या आहेत. महिला भगवान शंकररूपी इसर आणि गौरीच्या मातीच्या मूर्ती तयार करत असून त्यांना कपडे, दागिने आणि फुलांनी सजवले जात आहे. या मूर्ती सुंदरपणे सजवल्या जातात. अलिकडच्या काही वर्षांत गणगौरच्या लाकडी मूर्तीही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. या सजलेल्या मूर्तींना परदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे येथील कारागिरांना परदेशी व्यापाराची संधी मिळाली आहे. गणगौर उत्सव जयपूरसह उदयपूर, जोधपूर आणि बिकानेरमध्येही साजरा होतो. तसेच मध्यप्रदेशमध्येही हा उत्सव साजरा केला जातो. इंदोर आणि नीमच या शहरांमध्ये गणगौर उत्सवाची विशेष धूम असते.
मात्र या सर्वात जयपूरच्या सिटी पॅलेसमधील गणगौर उत्सवाची परदेशातही विशेष चर्चा होते. सिटी पॅलेसच्या त्रिपोलिया गेटमधून हत्तीवरून माता पार्वतीची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत अनेक सजवलेले रथ असतात. त्यामध्ये माता गौरीच्या आवडीच्या वस्तू ठेवण्यात येतात. ही मिरवणूक इतकी लोकप्रिय आहे की, या मार्गावरील सर्व हॉटेल्समध्ये वर्षभर आधीच बुकिंग केले जाते. यावर्षीही माता गौरीच्या मिरवणुकीच्या मार्गावरील हॉटेल्स हाऊसफुल असल्याची माहिती आहे.
सई बने.
- 16-day fasting
- Bikaner royal tradition
- Chaitra Shukla Tritiya
- City Palace Tripolia Gate
- clay idols decoration
- cultural tourism India
- elephant parade
- folk music and attire
- foreign tourists India
- Gangaur Festival
- Goddess Gauri procession
- golden palanquin
- handicrafts market
- heritage festival Rajasthan
- Isar and Gauri
- Jaipur celebration
- Lord Shiva worship
- marital prosperity prayer
- married women rituals
- Rajasthan culture
- royal procession Jaipur
- tourism in Jaipur
- traditional rituals
- Udaipur Pichola Lake