America, Israel आणि Iran यांचे युद्ध गेले ४० दिवस चालू आहे. रोजच्या रोज होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रतिहल्ल्याच्या बातम्यानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या रोज मारलेल्या ‘वैचारिक/शाब्दिक’ कोलांट्या उड्यांमुळे हे युद्ध किती काळ लांबणार,या युद्धाचे फलित काय वगैरे प्रश्नानी साऱ्या जगाला भंडाऊन सोडले आहे. त्यातच इराणने HORMUZ च्या सामुद्रधुनीची कोंडी केल्याने अक्खे जग हवालदिल झाले. सुक्याबरोबर ओलेही जळते त्याप्रमाणे होरमुझची सामुद्रधुनी इराणने रोखल्यामुळे युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या देशांबरोबरच इतर सर्वं देशही भरडले जाऊ लागले. अनेक देशांचे तेलवाहू तसेच गॅसवाहक टँकर्स /जहाजे समुद्रात अडकून पडली त्यामुळे सर्वत्र इंधनाची टंचाई निर्माण होऊन तेलाच्या /गॅसच्या किमती आकाशाला भिडल्या. त्यातच ट्रम्प यांनी इराणला होरमुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांची मुदत देतानाच धमकी दिली की अन्यथा इराणचे पृथ्वीतलावरचे अस्तित्व नष्ट होईल. सर्वं जग या धमकीने हादरून गेले असतानाच ८ एप्रिलच्या सकाळी अचानक अमेरिका-इस्राएल व इराण यांच्यात १४ दिवसांसाठी तात्पुरता शस्त्रसंधी झाल्याची बातमी येऊन धडकली आणि भारतात साखरझोपेत असलेल्या अनेकांना संभ्रम पडला की आपण सत्यात आहोत की स्वप्नात.

एकंदर बातम्यावरून असे समजते की इराणने १४ दिवसापूर्ती होरमुझची सामुद्रधुनी खुली करण्यास मान्यता दिली असून आक्रमक तसेच बचावात्मक लष्करी कारवायांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनेही १४ दिवसाच्या हंगामी शस्त्रसंधीची घोषणा केली. इस्राएलनेही अमेरिकेच्या सुरात सूर मिसळला आहे पण आपल्या सोयीने. लेबेनॉन वरील इस्राएलचे हल्ले चालूच राहतील. या घडामोडीचा त्वरित दृश्य परिणाम म्हणजे कृड तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि विविध शेअर बाजारात आलेली तेजीची लाट. या १४ दिवसाच्या शस्त्र संधीमुळे सर्वं जगाला श्वास घेण्यास थोडी उसंत मिळाली आहे. तसेच युद्धखोर राष्ट्राना झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व नव्याने सज्ज होण्यासाठी थोडा अवधी मिळाला आहे एवढेच. असे समजते की इराण इस्राएलमध्ये समझोता होण्यासाठी पाकिस्तान, चीन यांनी मध्यस्थी केली आहे. पाकिस्तानने त्याचे ढोल पिटण्यास सुरुवात केली आहे आणि त्यात अपेक्षे प्रमाणे वादकाच्या भूमिकेत भारतातील काँग्रेस पक्ष हिरीरीने सहभागी झाला आहे. भारतात अनेक जणांना इराण प्रेमाचे भरते आले आहे.
हे देखील वाचा
Iran’s Long History : अलेक्झांडर ते ट्रम्प… इराणपुढे झाली सर्वांची हार
इराणने प्रचंड मानवी, लष्करी व मुलकी नुकसान सोसूनही अमेरिकेला चिवटपणे लढत दिली म्हणून इराणचा डंका वाजत आहे. सर्वोच्च नेत्याबरोबरच नेतृत्वाच्या अनेक फळ्या उध्वस्त होऊनही इराण कसे काय लढू शकले याचे अनेक जणांना आश्चर्य वाटत आहे. पण खरी पडद्यामागची गोष्ट अशी आहे की इराण एकटा हे युद्ध लढत नव्हता. चीन व रशिया यांची इराणला सक्रिय मदत असल्याशिवाय इराण तग धरणे अशक्य होते. रशिया व चीन यांचे तज्ज्ञ इराणला सर्वं प्रकारचे मार्गदर्शन करत असणार. त्यामुळेच इराणने अमेरिकेच्या छत्राखाली असलेल्या आखाती देशांना लक्ष्य बनवले आणि होरमुझची सामुद्रधुनी रोखून साऱ्या जगाचे नाक दाबले.लढाईच्या पहिल्याच दिवशी नेर्तृत्वहीन झालेला कुठलाही देश असे साहसी व दूरगामी निर्णय घेऊ शकणार नाही.संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत बहरीन या देशाने होरमुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा ठराव आणला असता रशिया व चीनने ‘नाकाराधिकार ‘( veto )चा वापर केला यावरून रशिया व चीन यांची फूस /सहकार्य असल्याशिवाय इराण अमेरिकेला आव्हान देऊ शकत नव्हता या दाव्याला पुष्टी मिळते.थोडक्यात चीनच इराणला पुढे करून अमेरिकेशी लढत आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे.ट्रम्पना याची पूर्ण कल्पना आहे.अमेरिकेच्या वेनेझुंलावरील कारवाईचा बदला चीन घेत असावा कारण वेनेझुला हा देश चीनचा मुख्य तेल पुरवठादार होता.

इराणने अमेरिकेसमोर शस्त्रसंधीसाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्या अत्यंत एकतर्फी व अव्यवहार्य आहेत. याचा कर्ता करविता चीनच असणार. अमेरिकेला या अटी मान्य होणे अशक्य आहे. त्यामुळे हा १४ दिवसाचा शस्त्रसंधी जर खरोखरच टिकला तरी ती वादळापूर्वीची शांतता असेल. त्यातच ट्रम्प यांच्या अतार्किक आणि लहरी स्वभावाचा थांग कुणाला लागणे असंभव आहे.त्यामुळेच युद्ध संपले म्हणून हुरळून जाण्यात अर्थ नाही. काँग्रेस नेहमीप्रमाणे पाकिस्तानचे गोडवे गात भारताच्या परराष्ट्रनितीबद्दल टीका करत असला तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जगासाठी ‘शांतीदूत ‘ होण्याच्या नादात राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करण्याऱ्या स्वप्नाळू नेतृत्वाचे भीषण परिणाम भारत अजून भोगत आहे. मोदी सरकार या मोहापासून कटाक्षाने दूर राहिले आहे. खामेनीच्या हत्येचा भारताने निषेध केला नाही तर निव्वळ शोक व्यक्त केला. हा मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना होता. यामुळे भारताचे आखाती देशांशी मित्रत्वाचे संबंध कायम राहिलेच पण इराणचे दरवाजेही आपल्यासाठी खुले राहिले. त्यामुळेच होरमुझ मधून भारतीय जहाजाना इराणने परवानगी दिली. भारताने इस्राएल व अमेरिकेचा उघड निषेध करणे सुद्धा टाळले,तरी सुद्धा रशिया आपल्या तेलाच्या गरजा भागवायला पुढे आला.’मौनम सर्वार्थ साधनम’ हेच या काळात आपल्या परराष्ट्रनितीचे सूत्र राहिले आहे. या यशस्वी धोरणमुळेच भारतात इंधन पुरवठ्याची स्थिती नियंत्रणात राहिली आहे. यापुढे हे युद्ध पुन्हा चालू होणार नाही याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळेच हा १४ दिवसांचा शस्त्रसंधी ही ‘आभासी शांतता ‘ आहे की काय ही शंकेची पाल चुकचूकत राहणारच.
लेखक – रघुनंदन भागवत