चंद्रशेखर आजाद यांच्या आईवर शेणकुट विकायची वेळ आली होती… हो या भारताचे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या आई जगरानी देवी यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली होती. पण एक असा मराठी क्रांतिकारक होता, ज्यांनी पुढे आजादांच्या आईंचा अखेरपर्यंत सांभाळ केला, ते म्हणजे सदाशिवराव मलकापुरकर… आज हे नाव अनेकांना अपरिचित आहे. अगदीच मराठी लोकांनाही या मराठी क्रांतीकारकाबाबत फारशी माहिती नाही. पण त्यांचं योगदान अफाट आहे. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी चंद्रशेखर आजाद तत्कालीन अलाहाबादमधल्या आल्फ्रेड पार्कमध्ये हुतात्मा झाले. विचार करा… एकटा माणूस ब्रिटीशांच्या फौजफाट्याला भिडला पण त्यांच्या काही हाती लागला नाही. आपल्या पिस्तुलातली शेवटची गोळी त्यांनी स्वत:ला झाडून घेतली होती. ज्या झाडाखाली ते हुतात्मा झाले, त्या झाडाची लोकं पूजा करायला लागले, म्हणून ब्रिटिशांनी ते झाड कापून टाकलं. त्यांचे अंत्यसंस्कारसुद्धा गुपचूपमध्ये रसुलाबाद घाटावर नेऊन करण्यात आले. म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा आईला आपल्या मुलाला शेवटचं पाहता सुद्धा आलं नाही. आजादांच्या घरची परिस्थिती आधीच हलाखीची होती. त्यात घरचा महत्त्वाचा माणूस गेला, हे ऐकून त्यांना धक्काच बसला.
चंद्रशेखर आजाद यांच्या आई जगरानी देवी आणि सदाशिव मलकापुरकर यांचा तुरुंगात असतानाचा फोटो
महत्त्वाचं म्हणजे आजाद यांच्या शोधात ब्रिटीश त्यांच्या कुटुंबियांना त्रास देऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाची माहिती गोपनीय ठेवली होती आणि फक्त एकाच माणसाचा त्यांच्या घराचा पत्ता सांगितला होता, ते होते सदाशिव मलकापुरकर ! चंद्रशेखर आजाद यांचे सर्वात विश्वासू साथीदार… त्यांना माहित होतं, अनेक जण फितुरी करू शकतात पण सदाशिव कधीच नाही. सदाशिव मलकापूरकर यांचा जन्म १९११ चा… उच्च शिक्षण घेण्यासाठी ते झांशीमध्ये आले होते. त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यात अनेक युवा मोठ्या संख्येने सामील होत होते. त्यामुळे सदाशिव हे सुद्धा स्वातंत्र्यलढ्यात उतरले. याच दरम्यान त्यांची भेट मास्टर रुद्रनारायण यांच्यासोबत झाली आणि मास्टर यांनी त्यांची भेट चंद्रशेखर आजाद यांच्याशी घडवून दिली आणि पुढे ते hsra मध्ये सामील झाले. आता मी वरती एक नाव घेतलं मास्टर रुद्रनारायण… तर आपल्यातल्या अनेकांनी आजाद यांचा हा ऐतिहासिक खरा फोटो पाहिलाच असेल. हा फोटो आजाद यांचे कुटुंब म्हणून पसरवला जातो. पण हे आजाद यांच्यासोबत जे कुटुंब आहे, ते मास्टर रुद्रनारायण यांचच आहे आणि हा फोटोसुद्धा त्यांनीच काढला होता.
मास्टर रुद्रनारायण यांनी काढलेला आजाद यांचा फोटो सोबत रुद्रनारायण यांचं कुटुंब
आता सदाशिव यांचे बंधू शंकरराव मलकापूरकर हेसुद्धा आजादांच्या जवळचे सहकारी होते. संघटनेत त्यांची भेट भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, भगवतीचरण वोहरा आणि इतर क्रांतीकारकांसोबतही झाली होती. एकदा राजगुरू यांना बॉम्ब आणि शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी अकोलाला जायचं होतं. यावेळी भुसावळला गाडी बदलायची होती. पण त्यांची टीप पोलिसांना लागली आणि भुसावळ स्टेशनवरच त्यांना अटक झाली. यावेळी त्यांच्यासोबत भगवानदास माहौर हे क्रांतिकारकसुद्धा होते आणि विशेष म्हणजे तेसुद्धा मराठीच… त्यांना जळगाव जेलमध्ये हलवण्यात आलं आणि इथेच त्यांच्यावर केस सुरु होती. एकदिवस त्यांना कळलं की आपल्याच संघटनेमधले फितूर जळगावमध्ये येणार होते. यावेळी सदाशिव यांचे बंधू शंकरराव यांनी जेवणाच्या डब्यातून त्यांच्यापर्यंत पिस्तुल पाठवली. सदाशिव यांनी त्या दोन्ही फितुरांना मारण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना जखमीच करू शकले. त्यांचा हाच पराक्रम भुसावळ बॉम्ब खटला म्हणून प्रसिद्ध आहे. या गोळीबारामुळे सदाशिव मलकापूरकर आणि भगवानदास माहौर या दोघांची रवानगी अंदमानाच्या तुरुंगात करण्यात आली, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आता तिथून परतून येण्याचा काहीच चान्स नव्हता. हे सगळं घडलं, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, आजाद हे सर्व हुतात्मा होण्याच्या आधी… आठ वर्ष ते तुरुंगातच होते. इथे काय घडत होतं, त्यांना त्याचा काहीच पत्ता नव्हता.
हे देखील वाचा
शहीद भगत सिंग यांची क्रांतिकारी आई विद्यावती कौर !
१९३८ साली जेव्हा कॉंग्रेस मंत्रीमंडळाची स्थापना झाली तेव्हा आठ वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांना सोडण्यात आलं. बाहेर आल्यावर सगळं बदललं होतं. जवळचे साथीदार जिवंत नव्हते, काही तुरुंगात होते, फितूर झालेले फरार होते, संघटना संपली होती. पण आपलं क्रांतिकार्य चालू ठेवावं, असं त्यांना वाटलं. याचवेळी त्यांना चंद्रशेखर आजाद यांच्या कुटुंबाची आठवण झाली आणि ते तडकाफडकी मध्यप्रदेश मधल्या भवरा या गावात गेले. तिथे गेल्यावर त्यांना पहिला धक्का बसला की चंद्रशेखर आजाद यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. दुसरा धक्का म्हणजे आजाद यांच्या आई जगरानी देवी यांची परिस्थिती खूपच खराब आहे आणि त्यांच्यावर अक्षरशः शेणकुट विकायची वेळ आली होती. ब्रिटीशांच्या भीतीमुळे त्यांच्या आईंना इतके वर्ष कुणीही मदत करायला सरसावलं नव्हतं. त्या एकट्याच राहत होत्या. ते सोडा… पण ‘डकैत की मां’ असं त्यांना म्हटलं जात होतं. सदाशिव यांना गहिवरून आलं. ते आईंना म्हणाले की तुम्हीं माझ्यासोबत झाशीला चला. पण यावर त्या म्हणाल्या, माझ्या पतीने जिथे शेवटचा श्वास घेतला, मी सुद्धा शेवटपर्यंत त्याच जागेवर राहणार. सदाशिव यांनी विनंती केली, पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी सदाशिव यांनी त्यांच्या आईंना सांगितलं की, चंद्रशेखर यांची शेवटची इच्छा होती की, तुम्हाला मी तीर्थयात्रेला घेऊन जाऊ. त्यामुळे आपल्या मुलाची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत या. यानंतर त्या तयार झाल्या.

सदाशिवराव यांचं मूळ स्केच (वरती) आणि दुसरा AI द्वारे बनवलेला फोटो
सदाशिव जगरानी देवी यांना झाशीला घेऊन आले. इथे त्या निमोनी या गावात राहिल्या. सदाशिव यांच्या आईचं खूप आधीच निधन झालं होतं. त्यामुळे आपली आई म्हणून सदाशिव यांनी त्यांची खूप सेवा केली. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. एक मुलगा आपल्या आईसाठी कशाप्रकरे कर्तव्यनिष्ठ असतो, हे सदाशिव यांनी दाखवून दिलं. चंद्रशेखर यांच्या आठवणीत त्या नेहमी म्हणायच्या की, जर माझा चंदू आज जिवंत असता तर त्यानेसुद्धा हेच केलं असतं, जे आज माझा सदाशिव करतोय. सदाशिव मलकापुरकर यांच्याव्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती होते, ज्यांनी जगरानी देवी यांना मदत केली होती, ते होते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ! त्यांच्या आईंची हलाखीची परिस्थिती नेहरू यांच्याही कानापर्यंत गेली होती, तेव्हा नेहरूंनी ५०० रुपयांची मदत त्यांच्यासाठी पाठवली होती. याचवेळी शंकरराव यांनाही कळलं की सदाशिव झाशीमध्ये आजादांच्या आईसोबत राहत आहेत, तेव्हा तेसुद्धा पत्नीसोबत तिथे आले आणि शेवटपर्यंत त्यांची सेवा केली. १९४९ साली सदाशिव हे जगरानी देवी यांना तीर्थ यात्रेला घेऊन गेले होते. १९५२ साली आजाद यांच्या आईचं निधन झालं. यावेळी त्यांना मुखाग्नीसुद्धा सदाशिव मलकापुरकर यांनीच दिला.
हे देखील वाचा
Sukhdev History : सुखदेव यांनी स्वतःच्या हातावर अॅसिड टाकलं आणि…
सदाशिव यांनी लग्न केलं नाही. आपलं पुढचं जीवन व्यतित करण्यासाठी त्यांनी एसपीआय इंटर कॉलेज आणि हाफिज सिद्दिकी स्कूल येथे शिक्षकाचं काम केलं. त्यांच्या म्हातारपणात शासनाची कसलीही मदत त्यांना मिळाली नाही. प्रत्येक सशस्त्र क्रांतिकारकाच्या वाट्याला हीच उपेक्षा आलेली होती. वयाची ८० ओलांडल्यानंतर १९९५ साली त्यांचं निधन झालं. पण त्यांचं सशस्त्र क्रांतीकार्य त्यासोबतच मातृभूमीच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या वीराच्या आईची सेवा करणं, या दोन्ही गोष्टी नेहमीच प्रेरणा देत राहील. शेवटी हेच की असे अनेक क्रांतिवीर आजही अपरिचित आहेत, त्यांचा आजच्या काळात योग्य सन्मान व्हावा, त्यांचं स्मरण प्रत्येकाला असावं इतकच…!
– सागर जाधव