दादा वारले नाहीत, चुकीची बॉडी आणली… या भावना आहेत, दादांवर प्रेम करणाऱ्यांच्या… आमदार अमोल मिटकरी यांनी हे भावनिक स्टेटमेंट जरी केलं असलं तरी पुढे ते म्हणाले की अजितदादांच्या विमान अपघाताची पूर्ण चौकशी झालीच पाहिजे. काही लोकं अजितदादांच्या हा अपघातच होता, असं म्हणत आहेत. तर काही लोकांची संशयाची सुई घातपाताकडे जात आहे. पण २८ जानेवारीच्या त्या सकाळी नेमकं काय घडलं ? याच अपघाताचं प्रकरण थोडं सविस्तर जाणून घेऊया. २८ जानेवारी २०२६… वेळ सकाळी ८ वाजून १० मिनिटं ! उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रायव्हेट जेटने मुंबईहून बारामतीला निघाले होते आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी… त्यांच्यासोबत विमानात 5 जण होते . या सर्वांना अजितदादांसोबत हवाई प्रवास करण्याचा अनुभव होता. ८.४० पर्यंत विमान बारामतीला पोहोचलं होतं. पायलटने बारामती एअरपोर्टला माहिती दिली की, आम्ही रनवे नंबर ११ वर Landing साठी येत आहोत. पण त्यांना रनवे दिसतच नव्हता. रनवे दिसायला लागला की सांगतो. एवढाच मेसेज आलेला होता. पण नंतर पायलटची एक किंकाळी ऐकू आली. विमान थोडं क्रॉस झालं आणि अचानक रनवेच्या बाजूलाच ८.४३ दरम्यान आदळलं. मोठा स्फोट झाला आणि अजितदादांसोबत पाचही जणांचा मृत्यू झाला. दादांची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळावरून पटली.

आता चौकशी तर सुरु झालीच… विमानातला ब्लॅक बॉक्स सापडला. त्यासोबतच फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट Voice रेकॉर्डरसुद्धा काढून घेण्यात आला आहे. आता ही चौकशीची दुसरी बाजू झाली, पण अनेकांनी या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला. अपवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द शरद पवार… या दोघांनीही हा अपघातच आहे, त्यावर राजकारणाचा मुलामा चढवू नये, असं सांगितलं. पण अजितदादांचे अगदीच जवळचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी तर इतके प्रश्न उपस्थित करून ठेवले, की ज्यावर राज्यभर चर्चा सुरु झाली आहे. मिटकरी म्हणाले की, हा घातपातच असू शकतो. कारण विमानात सहा लोक होते, अशी माहिती सुरुवातीला माध्यमांनीच दाखवली. पण प्रत्यक्षात पाचच लोकांचे मृतदेह कसे आढळून आले ? याचं उत्तर प्रशासनानं द्यावं, अशी मागणी मिटकरीनी केली. याशिवाय ते म्हणाले की, जर हा विमान अपघातच होता, तर डेड बॉडी लगेच फुगली कशी काय ? यानंतर मिटकरी यांनी थेट धमकीसुद्धा दिली आहे की, यात जर घातपात असल्याचं खरंच समोर आलं आणि यात कुणाचा हात असेल तर त्याच्या घरात पाळणा हलवायला कुणी शिल्लक राहणार नाही. दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसताना विमानात असलेल्या कागदपत्रांना साधा जाळसुद्धा लागला नाही. कागदपत्र कसे जळाले नाहीत? हा सवालसुद्धा त्यांनी विचारला.

त्यांच्या प्रश्नांची मालिका इथेच थांबली नाही… तर त्यांनी एअर ट्राफिकबद्दलही प्रश्न उपस्थित केला. त्या विमानात इंधन असताना शंभर घिरट्याही त्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंगसाठी प्रयत्न केला असता. तरी दादांचा जीव वाचला असता. धावपट्टी दिसत नाही, म्हणून महत्त्वाचा कॉल देण्यात आला होता. पुण्यावरून सांगितलं गेलं की, तुम्ही पुण्याला लँड करा. मग त्या पायलटने तिथे लँड का केलं नाही ? दोन्ही पायलट कसे बदलले गेले ? मिटकरी यांच्या प्रश्नांमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर अनेक नेते यावर व्यक्त झाले. शिवसेना उबाठा गटाचे संजय राउत यांनीही अजितदादांचं विमान अपघात प्रकरण साधं नाही, असं म्हटलं. अजित पवार यांच्यासारखा मोठा नेता विमानात बसतो. त्यांच्यासोबत कुणीही प्रमुख व्यक्ती नाही, ओएसडी नाही. विमानाच्या मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे माझ्या आणि लोकांच्या मनात शंका येणारच… अगदीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही हा अपघात झाला त्यावेळी काहीतरी गडबड झाली, असं वक्तव्य केलं. भुजबळ हे प्रत्यक्ष अपघात झालेल्या ठिकाणी गेले होते. ते म्हणाले की, मी जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो तेव्हा मला हा प्रश्न पडला की विमान इथे आलंच कसं काय? टेबलटॉप आहे तरी विमान साधारण ७० फूट खाली कोसळलं? सीसीटीव्ही कव्हरेज आम्ही पाहिलं एक घिरटी घालून विमान गेल्यानंतर दुसऱ्या घिरटीच्या वेळी सरळ असलेलं अचानक विमान पलटी मारताना दिसतंय आणि त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठे तरी काही तरी गडबड झाली आहे.
हे देखील वाचा
त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्याही मनात हाच सवाल आहे की, खरंच अजित दादांचा अपघात झालाय की त्यांच्यासोबत घातपात झालाय… पण सध्या या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरु आहे. विविध क्षेत्रामाध्ले तज्ञ यावर तपास करत आहेत. त्यामुळे नेमकं विमानासोबत काय झालं याचा निष्कर्ष आतातरी आपण काढू शकत नाही.