उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधामांची यात्रा यमुनोत्रीपासून सुरू होते आणि बद्रीनाथ येथे या यात्रेचा समारोप होतो. ही चारधाम यात्रा म्हणजे आध्यात्मिक शांती आणि हिमालयाच्या नैसर्गिक सौंदर्याचा मिलाफ मानला जातो. २०२६ या वर्षात चारधाम यात्रेची सुरुवात १९ एप्रिलपासून होत आहे. यमुनोत्री धाम यात्रा १९ एप्रिल २०२६ रोजी सुरू होईल. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. या यात्रेनिमित्ताने यमुनोत्री धाम यात्रेचे महत्त्व किती आहे, याची माहिती आपण घेणार आहोत. ( Yamunotri Dham )

यमुनोत्री धाम यात्रा ही आध्यात्मिक शुद्धीकरण आणि मोक्षाचा एक महत्त्वाचा मार्ग मानली जाते. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेतील पहिले स्थान म्हणून यमुनोत्री धामचे महत्त्व अधिक आहे. हे धाम पवित्र यमुना नदीचे उगमस्थान आहे. येथे स्नान केल्याने अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते, अशी भावना आहे. माता यमुना ही यमराजाची बहिण आहे. तिची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असेही मानले जाते. येथील यमुनामातेचे मंदिर अनोखे आहे. या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दिव्य शिलेची पूजा केली जाते. ही दिव्य शिला देवी यमुनेचे प्रतीक मानली जाते. येथील सूर्यकुंडासारख्या गरम पाण्याच्या कुंडात भात आणि बटाटे शिजवून प्रसाद केला जातो. आणि हा प्रसाद म्हणजे आदिशक्तीचा आशीर्वाद मानला जातो. हिमालयाच्या कुशीत, ३,२९१ मीटर उंचीवर वसलेले यमुनोत्री धाम म्हणजे मानसिक शांतीसाठीही भाविकांचे प्रथम पसंतीचे धाम आहे.
या यमुनोत्री धामबाबत अनेक रहस्येही सांगितली जातात. माता यमुनोत्री ही प्रत्यक्ष सूर्यदेवाची कन्या आहे. त्यामुळे तिच्या तेजामुळे नकारात्मक विचार नष्ट होऊन भाविकांचे जीवन सफल, संपूर्ण होते, अशीही आख्यायिका येथे सांगितली जाते. स्कंद पुराणानुसार, यमुनेच्या थंड पाण्यात केवळ स्नान केल्याने भक्ताची अकाली मृत्यूच्या भीतीतून सुटका होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. सोबतच यमुनोत्री मंदिराच्या संकुलात असलेल्या अनेक मंदिरांबाबतही अनेक आख्यायिका आहेत. ही मंदिरे त्यांच्या प्राचीनतेसाठी ओळखली जातात. स्थानिक आख्यायिकांनुसार, ती सत्ययुगातील आहेत. यमुनोत्रीच्या आसपास अनेक दुर्गम गुहा आहेत, जिथे प्राचीन काळी ऋषीमुनींनी कठोर तपश्चर्या केल्याची माहिती आहे. पौराणिक कथेनुसार, हे ठिकाण असित मुनी ऋषींचे निवासस्थान होते. असित मुनी येथे यमुना नदीच्या काठावर ध्यान करत असत. स्थानिक दंतकथा आणि प्रचलित समजुतींनुसार, देवांनीही या गुहांमध्ये ध्यान केले आणि अनेक दैवी घटना घडल्या आहेत. आजही या गुहांमधील शांती आणि त्यांच्याशी निगडित दिव्य अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे ध्यानधारणा करण्यासाठी येतात. ( Yamunotri Dham )
सूर्यकुंड हे यमुनोत्री धामचे सर्वात मोठे आकर्षण आहे. कडाक्याच्या थंडीत आणि बर्फातही या कुंडातून उकळते पाणी बाहेर पडते. भाविक त्यात कापडात गुंडाळलेले भात आणि बटाटे शिजवतात. याचाच येथे प्रसाद वाटला जातो. या गरम कुंडांतील पाण्याचे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. यमुनोत्री धामचा प्रवास हा खडतर आहे. हा ५ किलोमीटरचा खडतर प्रवास केल्यानंतर भाविक या सूर्यकुंडातील पाण्यात स्नान करतात. त्यानंतर प्रवासाचा सर्व थकवा दूर झाल्याचा अनुभव त्यांना येतो.
=======
हे देखील वाचा : Ekadshi : वैशाख महिन्यात येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महत्त्व
=======
यमुनोत्री धाम येथील सध्याचे मंदिर १९व्या शतकात टिहरीचे राजे सुदर्शन शाह आणि नंतर जयपूरच्या महाराणी गुलेरिया यांनी बांधले आहे. १८३९ मध्ये टिहरीचे राजे सुदर्शन शाह यांनी या मंदिराची उभारणी केली. मात्र १९व्या शतकाच्या उत्तरार्धात भूकंपामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर जयपूरच्या महाराणी गुलेरिया यांनी मंदिर नव्याने उभारले. या मंदिराची वास्तुकलाही अद्भुत आहे. हे मंदिर पारंपरिक गढवाली शैलीत बांधलेले असून, मुख्य गर्भगृहात यमुना देवीची काळ्या संगमरवरी दगडाची मूर्ती स्थापित आहे. ( Yamunotri Dham )
हिवाळ्यात यमुनोत्री धामचे दरवाजे बंद झाल्यावर यमुनाजींच्या मूर्तीला खरसली येथे नेले जाते, जिथे हिवाळ्याच्या हंगामात त्यांची पूजा होते. खरसली येथील प्राचीन शिव मंदिरही प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथील निसर्गसौंदर्य बघण्यासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक येथे गर्दी करतात.
सई बने…