स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदा भाजपच्या निवडणुकांतील यशाचे रहस्य एका वाक्यात सांगितले होते. ते म्हणाले होते की, “भाजपा ना चुनाव जीतती है, ना हारती है; बल्कि वह हर चुनाव से कुछ ‘सीखती’ जरूर है.”
अटलजींनी मळलेल्या पाऊलवाटांचे राजमार्गात रूपांतर करताना मोदी-शहा यांना अटलजींच्या वरील मूलमंत्राचा अजिबात विसर पडलेला नाही, हे गेल्या काही वर्षांत भाजपने जिंकलेल्या तसेच हरलेल्या निवडणुकांतून स्पष्ट होते. ( BJP Vs TMC )
आता येत्या महिन्यात भारतात चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे, एक आसाम सोडले तर बाकीच्या बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत विरोधी ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्षांची सरकारे आहेत. पुदुच्चेरीत एनडीएचे, म्हणजेच भाजपचा मित्रपक्ष अण्णा द्रमुकचे सरकार आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. म्हणजेच या निवडणुकीत भाजपपेक्षा ‘इंडी’ आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यांच्यासाठी ही अग्निपरीक्षा ठरण्याची चिन्हे आहेत. परंतु या निवडणुकांतील यशापयशाचे मूल्यमापन मात्र भाजपच्या संदर्भात अधिक होणार आहे. ही गोष्ट भाजपचे भारतीय राजकारणातील मध्यवर्ती स्थान अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.

पाच राज्यांपैकी ज्याला ‘बॅटल रॉयल’ म्हणता येईल अशी लढत पश्चिम बंगालमध्ये होणार आहे. म्हणून त्या राज्याचा उहापोह प्रथम करूया.
पश्चिम बंगालमध्ये २०११ पासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे एकछत्री, एकतंत्री आणि एकपात्री राज्य आहे. मार्क्सवाद्यांची सलग ३५ वर्षांची राजवट उलथवून सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांनी डाव्या आघाडीला बंगालमधून शब्दशः हद्दपार केले आहे. या सर्व घडामोडीत भाजप चित्राच्या चौकटीतसुद्धा नव्हता. परंतु २०२६ च्या निवडणुकीत मात्र भाजप बंगालमध्ये सत्तेचा दावेदार म्हणून उदयास आला आहे. हीच गोष्ट अटलजींच्या वाणीची साक्ष पटवून देणारी आहे. ( BJP Vs TMC )
२०१६ च्या निवडणुकीत भाजपचे फक्त ३ आमदार निवडून आले होते. २०२१ च्या निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकताना मतशेअरमध्ये १०% वरून ३८% पर्यंत उडी मारली. ही छलांग ममतांच्या मनात धडकी भरवणारी होती. या निवडणुकीत ५६ जागा भाजप फार थोड्या मतांच्या फरकाने हरला होता. २०२१ मध्ये बंगालमध्ये भाजपची लाट निर्माण झाली होती; परंतु तिलाच ‘त्सुनामी’ समजून भाजपने ‘२००+’ चा नारा दिला आणि त्यात त्याची फसगत झाली.
२०२६ च्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने २०२१ मध्ये झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत भाजप वैयक्तिकरित्या ममतादीदींना लक्ष्य करत नाहीये. त्याऐवजी तृणमूल काँग्रेसच्या सरकारविरुद्ध आरोपपत्र सादर करताना भाजपने ममतांच्या कुशासनाविरुद्ध दंड थोपटून त्यांच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. एक प्रकारे भाजपने अजेंडा/नॅरेटिव्ह सेट करून ममतांना बॅकफूटवर ढकलले आहे. ( BJP Vs TMC )
जनतेला दैनंदिन जीवनात भेडसावणारे भ्रष्टाचार, टीएमसीची गुंडगिरी, राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, महिलांवरील अत्याचार, कट मनी, मुसलमानांचे तुष्टीकरण, घुसखोरांना दिले जाणारे संरक्षण/उत्तेजन, राज्यात नवीन उद्योगधंदे न येणे व त्यातून बेरोजगारीने धारण केलेले उग्र स्वरूप आदी विषय भाजपने ऐरणीवर आणले आहेत. या मुद्द्यांना ममता उत्तर देऊ शकत नसल्याने ‘बंगाली विरुद्ध गुजराती’, बंगाली लोकांविरुद्ध पक्षपात, बंगाली भाषेवरील कथित अन्याय वगैरे भावनिक मुद्दे पुढे करून ममता प्रादेशिक अस्मितेला सेंटर स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
=======
हे देखील वाचा : BJP : चंद्रपुरात भाजपने काँग्रेसला दाखवला गोव्याचा ‘फोंडा घाट’
=======
कोलकात्यातील आर. जी. कार (RG Kar) हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व तिची हत्या यामुळे ममतांचा भरवशाचा मतदार असलेला ‘भद्र’ समाज मुळापासून हादरला आहे. हा समाज यावेळी ममतांच्या पाठीमागे कितपत उभा राहील, याबाबत शंका आहे. संदेशखाली येथे आदिवासी महिलांवर ममतांच्या नेत्यांनी केलेल्या अत्याचाराचे प्रकरणही जनता विसरलेली नाही. ( BJP Vs TMC )
राज्यातील हिंदू समाज भाजपमागे एकवटताना दिसत आहे. जाळीदार टोपी घातलेल्या लोकांना हेल्मेट न घातल्याबद्दल पोलीस दंड ठोठावत नाहीत, परंतु हिंदूंच्या नावाने मात्र लगेच चलन फाडले जाते, हा पक्षपात लपून राहिलेला नाही.
निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ केल्याने जवळजवळ एक कोटी मृत, स्थलांतरित, फर्जी व घुसखोर बांगलादेशी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याचा जबर फटका तृणमूल काँग्रेसला बसणार आहे, हे निश्चित. याबाबत एक उदाहरण पुरेसे बोलके आहे. एका मतदाराच्या वडिलांच्या नावाने मतदान झाल्याचे आढळल्यावर त्याने चौकशी केली असता त्याला टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की त्याचे वडील अर्धा तासापूर्वी मतदान करून गेले. प्रत्यक्षात त्याच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता.
बंगालबाबत रोज नवीन सर्वेक्षणे येत आहेत. सर्व तज्ज्ञ मंडळी २०२१ च्या निवडणुकीत तोंडावर आपटल्याने आता सर्वजण ममताच पुन्हा सत्तेवर येईल असा ‘सेफ गेम’ खेळत आहेत. त्यातील ‘सी-वोटर’चे फसलेले अंदाज आणि राहुल गांधींनी हरलेल्या निवडणुकांची संख्या एकसारखीच आहे. त्यामुळे यशवंत देशमुख यांच्या ‘वोट ट्रॅकर’कडे मुळीच लक्ष देऊ नये. या महाशयांनी महाराष्ट्रात व हरियाणात सत्ताबदल होईल असे आपल्या ‘वोट ट्रॅकर’द्वारे छातीठोकपणे सांगितले होते. ( BJP Vs TMC )

त्यातल्या त्यात प्रदीप गुप्ता यांच्या ‘मार्टिज’ संस्थेचे सर्वेक्षण विश्वासार्ह वाटते. झारखंडमध्ये सर्व पोलस्टार्स भाजपला विजयी करून मोकळे झाले होते; त्यावेळी एकट्या प्रदीप गुप्तांनी झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेत येईल असे भाकीत केले होते आणि त्यांच्या अंदाजानुसारच दोन्ही पक्षांना जागा मिळाल्या होत्या. (प्रदीप गुप्तांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाबाबतचा अंदाज चुकला होता, हा अपवाद.)
एकूणच बंगालची निवडणूक रोमांचकारी होत असून ममतांसाठी ही लढत ‘डू ऑर डाय’ अशी आहे, तर भाजपसाठी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा स्वरूपाची आहे. भाजपाची ‘सीख’ विरुद्ध ममतांची ‘चीख’ अशी ही लढत होत आहे. ( BJP Vs TMC )
माझ्या मते, भाजप बंगालमध्ये चमत्कार घडवेल.
रघुनंदन भागवत
१ एप्रिल २०२६
- Amit Shah
- Assembly elections India
- Atal Bihari Vajpayee
- Bengali vs Gujarati narrative
- Bharatiya Janata Party (BJP)
- BJP strategy
- BJP vs TMC rivalry.
- election campaign strategy
- electoral politics
- governance and corruption
- illegal immigration debate
- India Alliance (INDI)
- indian politics
- law and order issues
- Mamata Banerjee
- Narendra Modi
- opposition politics India
- political analysis
- political narrative
- poll predictions India
- regional identity politics
- Trinamool Congress (TMC)
- Voter List Revision
- West Bengal elections
- West Bengal political scenario