भारताने इंग्लंडला अटीतटीच्या सामन्यात हरवून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता ८ मार्चला अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी’ स्टेडियममध्ये भारत विरुद्ध न्यूझिलंड हा अंतिम सामना खेळला जाईल.
भारताने इंग्लंडला ७ धावांनी हरवले, हे रेकॉर्डसाठी. पण शेवटच्या ओव्हरमध्ये ३० धावा हव्या असताना पहिल्या ३ चेंडूनंतर सामना हातातून गेल्यावर मग शेवटच्या ३ चेंडूत जॉफ्रा आर्चरने ३ षटकार मारून पराभवाचे अंतर कमी केले, एवढेच. पण इथेच इंग्लंडची स्ट्रॅटेजिक चूक झाली. सॅम करन झेलबाद झाल्यावर ख्रिस ओव्हर्टनला पाठवण्याऐवजी जॉफ्रा आर्चर आला असता, तर बाथेलच्या साथीने त्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला असता, असे वाटते; कारण आर्चर हा उत्तुंग षटकार मारणारा खेळाडू आहे. ( Road To Finals )
आज, माझ्या मते, सामनावीर हा पुरस्कार इंग्लंडचा बेथेल व भारताचा अक्षर पटेल या दोघांना विभागून मिळाला पाहिजे होता.
बेथेलने जी बॅटिंग केली, त्याला तोड नाही. केवळ २२ वर्षांचा हा खेळाडू जर धावबाद झाला नसता, तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता. अत्यंत दडपणाखाली त्याने जी ‘नेव्हर से डाय’ ही टिपिकल इंग्लिश खडूस वृत्ती दाखवली, त्यामुळे पराभवातसुद्धा इंग्लंडची मान ताठ राहिली. बेथेल हा इंग्लिश क्रिकेटचे भविष्य आहे.

अक्षर पटेल याने हॅरी ब्रूक्सचा जो अविश्वसनीय झेल घेतला, तो पाहून १९८३च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये कपिल देवने विवियन रिचर्ड्सचा मागे धावत जाऊन घेतलेल्या झेलाची आठवण झाली. अक्षरने घेतलेला झेल हा कपिलपेक्षा काकणभर सरसच होता; कारण २४ मीटर मागे धावत जाऊन त्याने सूर मारून झेल पकडताना जे टेम्परामेंट दाखवले, ते निव्वळ अद्वितीय. त्याने शेवटपर्यंत चेंडूवरील आपली नजर ढळू दिली नाही. ( Road To Finals )
फिल जॅक्स याचाही झेल खरं म्हणजे अक्षरनेच पकडला होता; पण हा झेल घेण्याच्या ओघात आपल्याकडून सीमारेषा ओलांडली जाईल, हे लक्षात येताच त्याने हलकेच चेंडू शिवम दुबेकडे उडवला आणि शिवमने प्रसंगावधान दाखवून तो चेंडू पकडला. टीव्हीवर बघताना या गोष्टी फार सोप्या भासतात; पण प्रत्यक्ष मैदानावर असे प्रसंगावधान आणि समयसूचकता दाखवण्यासाठी अतिशय उच्च दर्जाचे मानसिक संतुलन आणि एकाग्रता लागते. इथेही अक्षर काही मीटर अंतर आपल्या डाव्या बाजूला धावत आला होता आणि धावता धावता त्याने तो झेल पकडला होता.
‘कॅचेस विन मॅचेस’ असे क्रिकेटमध्ये म्हटले जाते. त्याचेच प्रत्यंतर अक्षरने आणून दिले, म्हणून त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळायला हवा होता.
हॅरी ब्रूक्स याने संजू सॅमसनचा हातातील झेल सोडला आणि तिथेच खरं तर इंग्लंडने सामना गमावला; कारण १५ धावांवर मिळालेल्या या जीवदानाचा संजूने पुरेपूर फायदा उठवला आणि मॅच-विनिंग ८९ धावांची खेळी केली. ( Road To Finals )
=======
हे देखील वाचा : Cricket : क्रिकेटमध्ये केवळ तीनच स्टंप का असतात?
=======
संजू व ईशान किशन यांनी फार सूझबूझ दाखवून फलंदाजी केली. त्यांनी जे हवेतून फटके मारले, त्यावर त्यांना चौकार अथवा षटकार मिळाले. एकदाही त्यांनी हवेत aimless फटके मारले नाहीत. तसेच, दोघांनी कॉपीबुक स्टाईलचे जमिनीलगत फटकेही मारले. तसेच, चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मान देऊन ते नुसते तटवत होते. एखादा चेंडू निर्धाव गेला म्हणून ते अस्वस्थ होत नव्हते. टी-२० प्रकारात हे दुर्मिळ दृश्य होते.
भारतीय संघ व्यवस्थापनाचेही एका बाबतीत कौतुक केले पाहिजे. त्यांनी कायम एक डावरा व एक उजवा फलंदाज यांची जोडी राहील, अशा तऱ्हेने बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केले. त्यामुळे इंग्लिश गोलंदाजांना लय सापडणे कठीण गेले. शिवम दुबे याला चौथ्या क्रमांकावर पाठवणे, हा याच धोरणाचा भाग होता. ( Road To Finals )
बुमराहला १८वी ओव्हर देताना कॅप्टन सूर्यकुमार यादवने चांगले नेतृत्वगुण दाखवले. बुमराहच्या या ओव्हरमुळेच सामना इंग्लंडच्या आवाक्याबाहेर गेला.
तरीही आपल्याकडे दुसरा ‘बुमराह’ नाही, ही उणीवही उघड झाली. एखाद्या दिवशी बुमराह चालला नाही, तर भारताला दुसरा तारणहार नाही, हे अनेक सामन्यांतून दिसून आले आहे.
इंग्लंडने आज भारताच्या वरुण चक्रवर्ती या ‘ट्रम्प कार्डचा’ अगदी ‘डोनाल्ड ट्रम्प’ करून टाकला. इराण जसा अमेरिकेला नडला आहे, तसेच इंग्रजांनी वरुणला नामोहरम करून टाकले. न्यूझिलंडच्या संघाने याची नोंद निश्चितच घेतली असेल.

भारतीय गोलंदाजांनी आपला मारा अधिक शिस्तशीर केला, तरच ते न्यूझिलंडच्या आक्रमक बॅटिंगला वेसण घालू शकतील. भारतीयांनी वाईड चेंडूचे प्रमाण कमी केले पाहिजे; कारण या चेंडूमुळे प्रतिपक्षाच्या धावांत भर पडतेच, शिवाय विरुद्ध संघाला जास्त चेंडू खेळायला मिळतात. ( Road To Finals )
भारताच्या रोमांचकारी विजयाबद्दल अभिनंदन करतानाच जे कच्चे दुवे आहेत, ते वेळीच सुधारावेत, एवढीच अपेक्षा व्यक्त करून त्यांना अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.
लेखक :- रघुनंदन भागवत
५ मार्च २०२६.
- Axar Patel
- batting order
- Bethell batting
- bowling weakness
- Bumrah over
- dropped catch
- final qualification
- Harry Brook
- India victory
- India vs England
- India vs New Zealand
- Ishan Kishan
- Jofra Archer
- match winner
- match winning innings
- Narendra Modi Stadium
- rising talent
- Sanju Samson
- semifinal thriller
- smart batting
- strategic mistake
- stunning catch
- Suryakumar Yadav
- T20 World Cup
- Varun Chakravarthy