येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा अनेक अर्थाने महत्त्वाचा समजला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे. हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो. या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळतं असे देखील म्हणतात. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय. त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय्य होते. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर फक्त शुभकार्य, दानच केले जाते असे नाही तर या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दान करण्याचेही महत्त्व आहे. पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे. उन्हाळ्यात जलयुक्त घट दान अर्पण केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो. शिवाय आपल्या पुराणांनुसार अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी अनेक देवतांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता. जाणून घेऊया त्याच देवतांबद्दल. (akshya Tritiya)
नर-नारायण
विष्णूच्या चोवीस अवतारांपैकी एक अवतार. धर्म व दक्षकन्या मूर्ती यांच्यापासून चाक्षुष मन्वंतरात उत्पन्न झालेले हे विष्णूचे ऋषिरूप अवतार होत. नारायण मोठा व नर लहान. पूर्ण शांती मिळण्यासाठी हे बदरिकाश्रमात तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपोभंगाकरिता इंद्राने सोळा हजार अप्सरा पाठविल्या. अप्सरा निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्याही जवळ आहे हे दाखविण्यासाठी नारायणाने आपल्या मांडीपासून उर्वशीनामक अप्सरा निर्माण केली व तिला इंद्राकडे पाठविले. सर्व अप्सरा नारायणाला शरण आल्या व त्यांनी ‘तू आमचा पती हो’ असा वर त्याला मागितला. पुढील अवतारी (कृष्ण) विवाह करण्याचे नारायणाने त्यांना आश्वासन दिले. पुढील अवतारात नरनारायण अर्जुन व कृष्ण यांच्या रूपांत जन्माला आले. कृष्णाने सोळा हजार स्त्रियांशी विवाह केला. नरनारायण तप करीत असता त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे पाहून प्रल्हादाने त्यांची निंदा केली. त्यावरून मोठे युद्ध झाले. शेवटी विष्णूने त्यांची समजूत घालून प्रल्हादास पाताळात पाठविले. नरसिंहाच्या मानवी अंगापासून नर व सिंहमुखापासून नारायण जन्मास आले, असे कालिकापुराणात म्हटले आहे. नर व नारायण हे काल्पनिक अवतार असून नारायण हे अव्यक्त निर्गुण तत्त्व व नर हे व्यक्त सगुण तत्त्व होय, असे महाभारतात म्हटले आहे. (Top Marathi News)

परशुराम
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना “शरादपि शापादपि” असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. त्यांची अशी महती वर्णली जाते. (Latest Marathi Headline)

हयग्रीव
हयग्रीव अवताराच्या वेगवेगळ्या कथा सांगीतल्या जातात त्यातली एक कथा अशी की,एकदा श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवी वैकुंठात निवांत बसले होते. त्यावेळी लक्ष्मी देवीचे सुंदर, आकर्षक रूप बघून श्रीविष्णू मोहीत झाले. लक्ष्मी देवीकडे पाहताना श्रीविष्णूंनी मंद स्मित केले. मात्र, लक्ष्मी देवीला वाटले की, श्रीविष्णू त्यांच्या सौंदर्याचा उपहास करताहेत. लक्ष्मी देवीला हे फार अपमानास्पद वाटले आणि श्रीविष्णूंचे शीर धडापासून वेगळे व्हावे, असा शाप लक्ष्मी देवीने दिला. कालांतराने एकदा युद्ध करता करता श्रीविष्णू थकून केले. आणि प्रत्यंच्या लावलेल्या धनुष्यावर डोके ठेवून विश्राम करू लागले. काही वेळाने त्यांना झोप लागली. तेव्हाच अन्यत देवतांनी यज्ञ करण्याचे योजिले. श्रीविष्णूंना जागे करण्यासाठी देवतांनी धनुष्याची प्रत्यंचा कापून दिली. प्रत्यंचा कापतातच त्यावर श्रीविष्णूंनी ठेवलेल्या डोक्यावर मार लागला आणि देवाचे शीर धडापासून वेगळे झाले. यामुळे सर्व ठिकाणी हाहाःकार माजला. भयभीत झालेल्या सर्व देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले. देवीने सांगितले की, श्रीविष्णूंच्या धडाला अश्वाचे शीर लावा. देवांनी विश्वकर्माच्या साहाय्याने श्रीविष्णूंना अश्वाचे शीर लावले आणि हा अवतार हयग्रीव म्हणवला. (Top Stories)

बसवेश्वर
बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील बागेवाडी जि. विजापूर येथे एका शैव ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. दरसाल त्याच दिवशी बसवजयंती साजरी केली जाते. त्यांना लिंगदीक्षा कोणी दिली, याविषयी विद्वानांत मतभेद असून संगमेश्र्वर, जातवेदिमुनी इत्यादींची नावे या संदर्भात सांगितली जातात. जातवेदिमुनींनाच ईशान्य गुरू असेही म्हटलेले असून तेच कूडलसंगम या विद्याक्षेत्राचे स्थानपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्र्वरांचे अध्ययन झाले, असे दिसते. बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ऊँ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती. हिंसा-चाराला कंटाळून ते कूडलसंगम येथे गेले व त्यांनी तेथे समाधी घेतली. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- akshay tritiya
- Akshaya Tritiya
- Akshaya Tritiya 2026
- Akshaya Tritiya and god
- Akshaya Tritiya and gods incranation
- bashveshwar
- gods incranation
- haygreev
- nar and narayan
- Parshuram
- vaishakh
- अक्षय्य तृतीया
- अक्षय्य तृतीया 2026
- अक्षय्य तृतीया आणि देवतांचे अवतार
- अक्षय्य तृतीया धार्मिक महत्त्व
- नर-नारायण
- परशुराम
- बसवेश्वर
- वैशाख
- हयग्रीव