त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. याच दिवसाला देव दिवाळी देखील म्हटले जाते. या दिवसाचे मोठे महत्व आपल्या धर्मात आहे. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात. या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टी केल्या जातात. या दिवशी वाटी जाळल्या जातात, दिवे लावले जातात. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काय केले जाते जाणून घेऊया.
हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. तसेच घरी, मंदिरांमध्ये, नदी किनारी दिव्यांची वेगवेगळी आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. यासोबतच विविध गड-किल्ल्यांवर देखील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात.
कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. सोबतच कार्तिकेयाने मोरपीस देखील अर्पण केले जाते. या दिवशी दिपदानाला देखील मोठे महत्व आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते.
कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा सुद्धा भरतात. या दिवशी नद्यांमध्ये स्नान केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन केले जाते. देवाजवळ तुपाचा दिवा लावला जातो. या दिवशी सत्यनारायण पूजन करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल, तर सत्यनारायणाची कथा ऐकण्याचे देखील लाभ असतात. या दिवशी लक्ष्मी नारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.

त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काहीजण १०५ वातींचा दिवा लावतात तर काही जण ७०० वातींंचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे. पूर्वी या वाटी घरी केल्या जायच्या मात्र आज बाजारात त्रिुपर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा लावू शकता.
त्रिपुरारी पौर्णिमा आख्यायिका
तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही तीन स्थानं ‘त्रिपुरे’ म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे तीन शहरे, जी आकाशातून फिरणारी असावीत.
हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्या वेळी, मध्यान्ह समयी, अभिजीत मुहूर्तावर आणि चंद्र – पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत!’ असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत हा:हा:कार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते.
============
हे देखील वाचा : जाणून घ्या त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व आणि माहिती
============
काही पौराणिक कथांनुसार, श्रीविष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. अठरा पुराणांमध्ये मत्स्यपुराणाचा समावेश आहे. श्रीविष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला, तो पुढे मत्स्यपुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- kartik purnima
- kartik purnima 2024
- kartik purnima aka tripurari
- kartik purnima information
- kartik purnima katha
- kartik purnima mahiti
- kartik purnima story
- त्रिपुरारी पौर्णिमा आख्यायिका
- त्रिपुरारी पौर्णिमा कथा
- त्रिपुरारी पौर्णिमा पूजा
- त्रिपुरारी पौर्णिमा माहिती
- त्रिपुरारी पौर्णिमा मुहूर्त
- त्रिपुरारी पौर्णिमा विधी